पुनर्विवाहानंतर विधवेचा मिळकतीत हिस्सा
वाचा : हिंदू वारसा कायदा १९५६.
समज : एक खातेदार तरूण वयात मयत झाल्यानंतर त्याच्या सर्व मिळकतीचे कुटुंबियांमध्ये कायदेशीर वाटप करण्यात आले. या वाटपामध्ये मयत खातेदाराच्या विधवेलाही कायदेशीर हिस्सा देण्यात आला होता.
कालांतराने सदर विधवेने दुसरा विवाह केला. खातेदार मयत झाल्यानंतर त्याच्या विधवेला जो हिस्सा देण्यात आला होता, तो आता त्या विधवेने दुसरा विवाह केल्यामुळे बेकायदेशीर ठरतो.
कायदा: याक्षणी सदर स्त्रीचा पती मयत झाला त्याक्षणी त्या स्त्रीचा वारसाधिकार अंमलात आला. विधवेने दुसरा विवाह केल्यामुळे तिच्या वारसाधिकाराला बाधा पोहोचत नाही.
हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६, कलम १४ अन्वये हिंदू स्त्रिची, तिच्या कब्जात असलेली कोणतीही संपत्ती, मग अशी मालमत्ता तिला विवाहापूर्वी किंवा नंतर वारसाहक्काने, मृत्यूपत्रिय दानाने, वाटणीमध्ये पोटगी म्हणून, नातलगांकडून मिळालेली असो किंवा तिने अशी मालमत्ता स्वत:च्या कौशल्याने, परिश्रमाने किंवा एखादी संपत्ती दान म्हणून, मृत्यूपत्रान्वये, इतर कोणत्याही लेखान्वये, दिवाणी न्यायालयाच्या हुकूमनाम्यान्वये, आदेशान्वये किंवा एखाद्या निवाड्यान्वये संपादित केली गेली असेल किंवा अन्य कोणत्याही मार्गाने संपादित केलेली असो, अशी संपत्ती, हिंदू स्त्री संपूर्ण स्वामी म्हणून धारण करते.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, हिंदू विधवेला तिच्या पतीच्या निधनानंतर वारस हक्काने प्राप्त झालेल्या मिळकतीची ती संपूर्ण मालक बनते. त्यानंतर जरी त्या विधवेने पुनर्विवाह केला तरीही तिला पती निधनानंतर वारस हक्काने मिळालेल्या मिळकतीवरील तिचा हक्क नष्ट होत नाही. (ए.आय.आर. १९७१, मुंबई, ४१३)